मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत
६ जून २०२५,
पुणे :-
राष्ट्रीय, राज्य तसेच स्थानिक मुद्द्यांवर प्रस्थापितांविरोधात लढा देत सर्वसामान्यांना न्याय देण्यासह शोषित-पीडित-उपेक्षित-वंचितांना शासनकर्ती जमात बनवण्यासाठीच बहुजन समाज पक्षाची स्थापना झाली आहे. 'सर्वजण हिताय,सर्वजण सुखाय' या मुलतंत्रावर आधारित बसपचे 'सोशल इंजिनियरिंग'चे मॉडेल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यामुळे नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केला.
आगामी निवडणुकीत पक्ष 'सामाजिक' प्रतिनिधित्वावर विशेष भर देणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.'जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी' या घोषवाक्यानुसार प्रत्येक शहरातील महानगर पालिका,जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीत उमेदवारी निश्चित केले जातील,असे डॉ.चलवादी म्हणाले. प्रस्थापित पक्षांनी समाजनिहाय प्रतिनिधित्व न दिल्याने राज्यातील बराच मोठा समाज राजकीय मुख्य प्रवाहापासून दूर राहिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. छत्रपतींच्या विचारानुसार सामाजिक जडणघडणीत सर्वच समाजाचा महत्वाचा वाटा आहे.याचनुसार पक्ष 'सामाजिक अभियांत्रिकी'वर कार्यरत असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्यांक तसेच खुल्या प्रवर्गातील नेतृत्वाला त्यांचे प्राबल्य असलेल्या क्षेत्रात उमेदवारी देण्याच्या अनुषंगाने पक्ष स्तरावर विचार केला जाईल,असे डॉ.चलवादी म्हणाले.
बसप मधेच सर्वसमावेशक प्रतिनिधित्व मिळू शकते.सर्वांना सोबत घेऊन, राजकीय प्रतिनिधित्व देऊन प्रत्येक समाजाचा विकास साध्य केला जाऊ शकतो.बसपच हॆ करू शकते, असे डॉ.चलवादी म्हणाले.पक्ष स्तरावर आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने यासंदर्भात चाचपणी सुरु असून, हत्ती निवडणूक चिन्ह असलेला निळा झेंडा राज्यातील प्रत्येक महापालिकेवर फडकेल, असा विश्वास डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला.

Post a Comment
0 Comments