मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे,
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवघ्या पहिल्याच पावसात पाणी साचल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. नव्याने विकसित करण्यात आलेल्या या विमानतळासाठी हजारो कोटींचा निधी खर्च करण्यात आला होता. या पायाभूत सुविधांचा डंका वाजवणाऱ्या प्रशासनाची आणि केंद्रीय नागरी उड्डाण खात्याची या घटनेने अकार्यक्षमता समोर आणली आहे.
प्रवासी, नागरिक, आणि सामाजिक संस्थांनी या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावरून देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रशासनाची कोंडी केली असून, "हा विकास आहे की दिखावा?" असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
या घटनेबाबत युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे सखोल चौकशीची मागणी केली आहे.
प्रथमेश आबनावे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की:
> “पुणे विमानतळ हा केवळ प्रवाशांचा नव्हे, तर पुण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा चेहरा आहे. त्याची ही अवस्था म्हणजे जनतेच्या कररुपी पैशाचा अपमान आहे. सदर घटनेतील दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.”
ते पुढे म्हणाले की, “विकासाच्या नावाखाली फक्त उद्घाटनांचे फोटो काढून, सर्व काही सुरळीत असल्याचे भासवले जाते. पण प्रत्यक्षात कामाच्या गुणवत्तेचा अभाव आणि निधीच्या चुकीच्या वापराचे हे उदाहरण धक्कादायक आहे.”
हे चित्र फक्त पुणे विमानतळापुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण पुणे शहरातच अशीच दयनीय अवस्था पहायला मिळत आहे. रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक ठप्प होणे, नाले तुंबणे – हे दरवर्षीचेच नव्हे तर दर पावसात पुणेकरांना सहन करावे लागणारे सत्य बनले आहे.
अशा परिस्थितीत केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार म्हणून मुरली मोहोळ यांना जबाबदारी स्विकारून स्पष्ट उत्तर द्यावे लागेल. केवळ विकासाचे उद्घाटन पुरेसे नाही – त्या विकासाचे व्यवस्थापन, गुणवत्ता, आणि परिणाम यांच्याही जबाबदारीपासून मंत्री सुटू शकत नाहीत.
पुणे आणि पुणेकरांना आपण काय दिलं, आणि काय दिलं नाही – या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची वेळ आता आली आहे.

Post a Comment
0 Comments