मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे : युवा पिढीतील रसिकांचे आवडते गायक राहुल देशपांडे यांनी सादर केलेल्या नाट्यपदांनी तसेच गझल गायनाने ‘स्वरझंकार'चा स्वरमंडप रविवारी भारून गेला. काही रचना पूर्ण तर काही झलक स्वरूपात ऐकवून राहुल यांनी रसिकांना खुश केले. अखेरच्या सत्रात राहुल देशपांडे आणि पंडित राकेश चौरसिया यांच्या एकत्रित गायन-वादनाच्या मैफलीने कळस गाठला.
राहुल यांनी संगीत संशयकल्लोळ नाटकातील ‘मृगनयना रसिकमोहिनी' या प्रसिद्ध नाट्यगीताने मैफलीस प्रारंभ केला. ‘लागी करेजवा कटार' ही गाजलेली रचना रसिकांना ‘कट्यार काळजात घुसली' या नाटकाच्या काळात घेऊन गेली. ‘बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात' हे भावगीत, ‘घर थकलेले संन्यासी' (पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत), ‘केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली', ‘तरुण आहे रात्र अजुनी', 'झूठे नैना बोले'.. अशी गीतांची बरसात झाली. त्यानंतर पं. राकेश चौरसिया यांच्या बासरीचे सूरही या मैफिलीत अलगद मिसळून गेले. ‘रंजिश ही सही' या गजलचे सादरीकरण, दिल की तपिश ही' कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातील गाजलेली रचना टाळ्यांच्या गजरात रसिकांनी डोक्यावर घेतली. सर्व वादकांनीही आपापल्या वाद्यांच्या माध्यमातून या मैफिलीच्या रंगतीत भर घातली. ‘कट्यार काळजात घुसली' याच नाटकातील ‘घेई छंद मकरंद' हे अतिप्रसिद्ध पद राहुल यांनी दोन्ही पद्धतीने (ठाय लयीतील पंडितजींच्या शैलीत आणि पाठोपाठ उस्तादी गतिमान शैलीत) सारख्याच ताकदीने पेश करीत स्वरझंकार संगीत महोत्सवाची सुरेल सांगता केली. त्यांना मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), ओजस अढिया (तबला), संजय दास (गिटार), संगीत हळदीपूर (की बोर्ड), रोहन वनगे (ऑक्टोपॅड) यांनी साथसंगत केली.

Post a Comment
0 Comments